अवैध वाहतूक रोखण्याकरिता नेमलेले पथक फक्त कागदावरच का ?
चामोर्शी: तालुक्यात महसूल प्रशासनाच्या डोळ्यासमोर वाळूची चोरट्या मार्गाने खुलेआम वाहतूक सुरू आहे. वाळूमाफियांवर कारवाई करण्यास व वाळूचोरी रोखण्यात स्थानिक महसूल प्रशासन अपयशी ठरले असून, जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष घालून वाळूमाफियांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे
सद्यास्थितीत जिल्ह्यात एकही रेती घाट लिलाव झाले नसताना बाधकामा करिता वाळू येत आहे तरी कुठून ? असा प्रश्न नागरिकामध्ये उपस्थित होत आहे.रात्रभर वाळूची वाहतूक सुरू असताना महसूल कर्मचारी व अधिकारी अनभिज्ञ कसे हेतु परस्पर याकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तालुक्यातील आमगाव बोरबन घाट, विसापूर, ताकडघाट, खोडदाघाट, दोंगरसर वगर, मोहर्ली / फराडा, वेलतुर / तुकून घाट, बोरघाट, या सर्व नदीघाटातून दररोज सुमारे ३० ते ३५ ट्रॅक्टर वाहनांतून बिनधास्तपणे वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. वाळूचोरीमुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. याला निम्मेदार कोण, सुमारे तीस ते पस्तीस वाहनांतून वाळू वाहतूक केली जात असताना स्थानिक महसूल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून वाळूमाफियांना अभय देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चामोर्शी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचे जाणीवपूर्वक हेतुपरस्पर दुर्लक्ष होत असल्याची नागरिकात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
शहरासह ग्रामीण भागात अनेक नवीन बांधकामे सुरू असून, वाळूमाफियांकडून ठिकठिकाणी वाळूचे साठे करण्यात आले आहेत
वाळूची टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करून ग्राहकांची लूट केली जात आहे. वाळूमाफियांचे सोबती दिवसभर महसूल कार्यालय परिसरात फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. सायंकाळी सात वाजता पासून सकाळी सहा वाजे पर्यंत वाळूची वाहतूक बिनधास्त सुरू असते वाळूचोरीस आळा घालण्यात अथवा कारवाई करण्यास स्थानिक महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून वाळूमाफियांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली जात आहे.




