गेल्या काही दिवसांपासून राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. राज्यात एकीकडे पाणीटंचाईचे भीषण सावट असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची दाणादान उडवल्याचे चित्र आहे. तर आगामी काळात अवकाळी पावसाचे हे ढग आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील 24 तासात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (IMD) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा मुक्काम कायम असल्याचा इशाराही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाचा’या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने अचानक एंट्री केल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. विदर्भात सलग कोसळणाऱ्या या अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने एकच दाणादान उडवली आहे. अचानक कोसळलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्यांसह शेतकरी आणि बाजार समितीलाही बसला आहे. तर आज 12 मे ते 16 मे दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, विजांच्या कडकडाटास 40-50 प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर आजपासून पुढील 24 तासात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.




