जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. बल्लारपूर-विसापूर, मूल-पोंभुर्णा-गोंडपिपरी, भोयगाव-गडचांदूर रस्ता बंद झाला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील वढोली पुलावरून पाणी जात असल्याने कुलथा मार्ग बंद झाला असून लाठी-आर्वी हा मार्गसुध्दा बंद झाला आहे. आज मूल येथे १४०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय बल्लारपूर, भद्रावती, चंद्रपूर, पोंभुर्णा, सिंदेवाही, वरोरा येथे अतिवृष्टी झाली असून, मूल-सावली येथे जोरदार पाऊस झाला आहे. चंद्रपूर शहरात पावसाने थोडी उसंत घेतली आहे. अशातच हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्याला २९ जुलै पर्यँत ऑरेज अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊसाची शक्यता वर्तविली आहे.
संततधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे व जलायशे पूर्णपणे भरली आहेत. मागील पाच दिवसापासून पावसाची संततधार सुरूच आहे. असाच पाऊस राहिल्यास जिल्ह्यात पुराचा धोका उद्भवण्याची भीती वर्तवली जात आहे. वर्धा, वैनगंगा, इरई या प्रमुख नद्या ओसंडून वाहू लागल्या आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी चंद्रपूर शहर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. या पाऊसामुळे नदी व नाल्यांना पूर आल्याने अनेक मार्ग बदं झाले आहेत. पोंभुर्णा तालुक्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झालेली आहे. अतिवृष्टीमुळे पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा येथील रमेश श्रावण मांडोगडे यांचे कवेलू घर कोसळल्याने घरातील संसार उपयोगी सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही. तसेच बाबुपेठ वार्ड मोठी सवारी बंगल्या जवळ सलीम बी अख्तर हुसेन यांचे घर संततधार पाऊसामुळे कोसळले आहे.नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यात २७ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट तर २८ ते २९ जुलै पर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
शाळा, महाविद्यालये शनिवारी बंद
चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता व काही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच प्रादेशिक हवामान खात्याने शनिवारी, २७ जुलै रोजी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालये शनिवारी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक रस्ते पाण्याखाली गेले. तसेच गावांना पुराचा वेढा पडल्याने जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या आहेत. हवामान खात्याने २७ व २८ जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होऊ नये, याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.




