भाईंदर: ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये (Bhayandar) एक अतिशय भयंकर घटना घडली आहे. शुक्रवारी (2 जून) समुद्रकिनाऱ्यावर एक संशयास्पद सुटकेस आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होता. ज्यामध्ये एका अज्ञात महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळून आला होता. याच प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावून आरोपींना मोठ्या शिताफिने अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदरमधील उत्तन परिसरातील पाली येथील समुद्रकिनाऱ्यावर एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आला होता. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी एक संशयास्पद बॅग ही समुद्र किनारी पाहिली होती. ज्यामध्ये नंतर मृतदेह असल्याचं दिसून आलं. त्यानंतर याबाबत तात्काळ पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत शिर नसलेला महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून 24 तासांच्या आतच मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या.
या तपासात पोलिसांना महिलेच्या हातावर जे टॅटू गोंदवलं होतं त्याचा मोठा फायदा झाला. कारण याच टॅटूमुळे नेमकी महिला कोण याची ओळख पटली आणि लागलीच खुनाच्या गुन्ह्याची उकलही झाली.
हातावर गोंदलेल्या टॅटूवरुन २४ तासाच्या आत खुनाच्या गुन्हयाची उकल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात इसमांनी काही कारणावरून महिलेला जीवे ठार मारून तिचे मुंडके शरीरापासून वेगळे करून शरीराचे दोन तुकडे करून ते बॅगेमध्ये भरले होते. तसेच तिची ओळख पटू नये या उद्देशाने बॅग समुद्रामध्ये दूर फेकून दिली होती. पण बॅग समुद्रकिनारी सापडल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.सदर गुन्हयाचे गांर्भीर्य लक्षात घेऊन जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 01 यांनी पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यास असलेल्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुन्हयाच्या घटनास्थळी बोलावून गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सूचना व मार्गदर्शन केले होते.
त्यानुसार काशिमिरा व नवघर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना तपासकामी लावण्यात आलं. मयत महिलेच्या हातावरील टॅटूच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणातून प्राप्त माहितीचे आधारे अनोळखी मयत महिलेची सर्वप्रथम ओळख पटविण्यात आली. त्यानुसार मृत महिलेचे नाव अंजली मिंटु सिंग (वय 23 वर्षे) रा. राज अपार्टमेंट, नायगाव असे असल्याचे निष्पन्न झाले.यानंतर पोलिसांनी अधिक तपास करत महिलेचा पती मिंटु रामब्रिज सिंग (वय 31 वर्ष) आणि महिलेचा दीर चुन चुन रामब्रिज सिंग (वय 35 वर्षे) यांना सगळ्यात आधी ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी दोघांकडेही चौकशी केली. मात्र, सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला.
अंजलीच्या हत्येचं नेमकं कारण काय?
यावेळी अंजलीच्या चारित्र्याचे संशय असल्याने तिचा पती आणि दिराने अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केली. त्यानंतर तिचं मुंडकं हे धडापासून वेगळं केलं. जेणेकरून कोणताही पुरावा सापडू नये. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे हे प्रकरण अवघ्या काही तासात उघडकीस आलं. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम करांडे हे करीत आहेत.




